ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील नाणेघाटाच्या पायथ्याजवळ वसलेले फांगणे हे एक छोटेसे गाव. याच गावात दोन वर्षांपूर्वी मोतीराम दलाल चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने योगेंद्र बांगर यांनी शिक्षणाची आगळीवेगळी क्रांती घडली होती. पुढे फांगणे हे गाव ‘आजीबाईंची शाळा’ उपक्रमामुळे नावारूपाला आले. या उपक्रमशील फांगणे गावात चंदन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील प्रत्येक घरात चंदनाचे एक झाड लावण्याचा मानस या परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत पूर्ण केला गेला.
या वेळी उपस्थितांना चंदनाच्या वृक्षाचे महत्त्व व फायदे सांगण्यात आले. चंदन लागवड कशी करावी, रोपे किती अंतरावर लावायची, त्यांची निगा कशी राखायची, उत्पादन किती मिळते याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. चंदन लागवडीनंतर सुरुवातीची तीन वर्षे चांगली निगा घ्यावी लागते. रोपांना योग्य मात्रेत खत आणि पाणी दिल्याने जोमदार वाढ होते.
‘चंदनाची लागवड हा अभिनव प्रयोग अनेकांना मार्गदर्शक ठरेल. या प्रयोगाच्या यशस्वितेनंतर कृषी क्षेत्रात निश्चितपणे चंदनाचा आर्थिक परिमळ पसरल्याशिवाय राहणार नाही,’ असे मत मुरबाड उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मोरे यांनी व्यक्त केले.
आरोग्य व इतर सामाजिक विषयांवर ठाणे व पालघरमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक नीलेश भगवान सांबरे यांनी या एकतेबद्दल व नावीन्यपूर्ण उपक्रमांबद्दल फांगणे ग्रामस्थांचे व आजीबाईंच्या शाळेतील सर्वं आजीबाईंचे, तसेच सर्वांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या शाळेचे संस्थापक शिक्षक योगेंद्र बांगर यांचे मनःपूर्वक कौतुक केले. तसेच चंदनाच्या वृक्षाचे महत्त्व व फायदे सांगून ते जगविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.
फांगणे गावातील सर्व महिलांसाठी महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत स्वयंरोजगार संधी उपलब्ध करणार असल्याचे नीलेश सांबरे यांनी या वेळी सांगितले. आजीबाईंच्या नावे सुरू होणाऱ्या अगरबत्ती लघुउद्योगाचे उद्घाटन या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता एपीआय धनंजय पोरे, चंदन उत्पादक संघाचे श्री. गोरे, वन अधिकारी कपिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.